श्री रामानंद महाराज
हे नाथा मम तू पिता, जननीही,
तू बंधू तू सोयरा।
माझा मित्र तरी जगात सखया,
तूचि नसे दुसरा ।।
त्राता तूच मला म्हणोनि चरणा
संन्निध आलो पाहा ।
रामानंद पदारविंद सुरसा,
सेवो मनोभृंगहा ।।
हे पूर्वाश्रमीचे श्री श्रीरामभट जयरामभट जोशी, रा. कोंडुर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली. त्यांना श्रीतुकामाईंचा अनुग्रह होता. स्वामी नित्यानंद महाराजानंतर स्वामी रामानंद महाराजांकडे मठाची सूत्रे आली. लहानपणापासूनच त्यांचा भक्तिमार्गाकडे ओढा होता. ते सुंदर भजन करीत असत. श्री तुकामाईंच्या येहळेगांव येथील देवालयाचा कळस त्यांना भक्तांनी अर्पण केलेल्या द्रव्य व सोन्यातूनच बसविण्यात आला होता. उमरखेड व येहळेगांब मठांचा विस्तार प्रामुख्याने त्यांच्या कालावधीत झाला. त्यांना लहान मुलांबद्दल फार प्रेम होते. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे शिष्यांना संतानप्राप्ती झाली. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनाही त्यांनी अध्यात्माकडे वळविले. ते केसापुरी (ता. माजलगाव, जि. बीड) येथे भाद्रपद व. ६ शके १८४५ रोजी आनंदरूप झाले. त्यांना गोदा-सिंदफना नद्यांच्या संगमावर वसलेल्या मंजरथ (ता. माजलगाव, जि. बीड) येथे जलसमाधी देणयात आली. नदीकाठी त्यांचे समाधीस्थळ आहे.