खाऱ्या पाण्याची विहीर झाली गोड पाण्याची
श्री तुकामाई गावाबाहेर झाडाखाली बसून गुराख्याने आणून दिलेली कांदाभाकरी खात असत. एकदा गावात पाण्याचे फारच दुर्भिक्ष झाले असता गावकऱ्यांच्या विनंतीवरून श्री तुकामाईंनी गावात जाऊन तेथे विहीर खणण्यासाठी जागा दाखवली. त्या विहिरीला पुष्कळ पाणी लागले; परंतु ते पाणी गोड नव्हते. मचूळ (खारे) होते. तेव्हा एका गावकऱ्याने श्रीतुकामाईकडे येऊन घडलेला वृत्तांत कथन केला. श्रीतुकामाई तेथे त्या विहिरीवर आले व चक्क बोंब ठोकून 'तुक्या मेला' असे म्हणत आरोळ्या ठोकीत त्यांनी त्या विहिरीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. इतर लोकही विहिरीला प्रदक्षिणा घालू लागले. तीन दिवसांनी चमत्कार घडला. त्या विहिरीचे पाणी पिण्यालायक गोड व मधुर झाले.