निष्ठावंत भक्तांची परीक्षा
एकदा श्रीतुकामाई स्वस्थपणे बोलत बसले होते. भोवती नेहमीची परिचित पाचपंचवीस मंडळी होती. बोलता बोलता अरण्य आणि हिंस्र पशूंच्या गोष्टी निघाल्या असता श्रीतुकामाई सहज म्हणाले - “जंगलातील जनावरे फार भयंकर असतात. खरा निर्भयच त्यांना तोंड देऊ शकतो.'' यावर एकजण म्हणाला, “'महाराज, आपण जवळ असल्यावर आम्हाला काय भीती !”' या त्याच्या म्हणण्याला इतरांनीही साथ दिली. इतक्यात श्रीतुकामाई जेथे बसले होते तेथून ते नाहीसे होऊन तेथे एक मोठा वाघ बसलेला दिसला. सर्वांची एकच त्रेधातिरपीट उडाली. सर्वजण घाबरून तेथून ताबडतोब पळून गेले. फक्त देशमुख, त्याची बायको आणि दत्ताराम हे तिघे सत्शिष्य तेथेच बसून राहिले. काही वेळातच वाघ नाहीसा होऊन तेथे श्रीतुकामाई पुन्हा बसलेले दिसले. तेव्हा श्रीतुकामाई म्हणाले, “प्रत्येकजण म्हणतो माझी तुमच्यावर निष्ठा आहे; पण खरी निष्ठा इतकी सोपी नसते, हे उमगून सर्वांनी ती वाढविण्याचा प्रयत्न करावा.”
हे समस्तही श्री वासूदेवो | ऐसा प्रतितिरसाचा वोतला भावो ।
म्हणोनि भक्तमाजी रावो | आणि ज्ञानिया तोचि ॥